आख्यान संकल्पांचं!

डिसेंबर महिना सुरू झाला की नव्या येणाऱ्या वर्षाच्या चाहुलीला सोबत घेऊन एक किडा नकळत बहुतांश लोकांच्या डोक्यात वळवळायला लागतो आणि तो असतो नवीन वर्षाच्या संकल्पाचा किडा. या किड्याला खतपाणी घालायला हल्ली व्हॉटट्स अप, फेसबुकवर सरत्या वर्षातील कटु आठवणी सोडून द्या आणि नव्याला सामोरे जाअसे भारी संदेश असतातचएकंदर या सगळ्यांमुळे हे नववर्षाच्या संकल्पाचं भूतप्रत्येकाच्या मानगुटीवर बसू लागलंय. संसर्गजन्य रोगासारखी त्याची लागण होऊ लागली तरुणाईतप्री-टीन्स मध्येही. जो तो आपापले येत्या वर्षासाठीचे संकल्प सोडू लागलात्या नुसार स्टेटस अपडेट करू लागला. अमका येत्या वर्षात अमुक तमुक किलो वजन घटवणार, तर तमका फक्त इंचेस कमी करणार. कोणी मागे पडलेला छंद पुन्हा जोपासणार, तर कुणी नियमित व्यायाम करणार, डाएट करणारे तर शेकड्यानी मिळतात.
मी सुद्धा याला अपवाद नव्हते हं! ज्या वेळी मी संकल्प सोडायला सुरुवात केली त्या वेळी फेसबुक, ट्विटर नव्हतं इतकंच; पण संकल्प मात्र केले जायचेच. अगदी  दरवर्षी न चुकता केले जायचे आणि वाट पहायला लावायचे हेच संकल्प नव्या वर्षाच्या पहाटेची.
पण अगदी मनापासून सांगते, जितके दिवस हे संकल्प करण्यात नि त्यांचं प्लॅनिंग करत स्वप्नं पहाण्यात घालवले, त्याच्या निम्मे दिवसही कधी माझ्याकडून एकही संकल्प पुरा केला गेला नाही. अनेक संकल्पांनी तर जेमतेम जानेवारीचा पहिला पंधरवडा पाहिला असेल.

आजही लख्खपणे आठवतोय मी केलेला अगदी पहिलावहिला संकल्पशाळेत वर्गशिक्षिकेने त्यांच्या दैनंदिनी लिहिण्याच्या पंचवीस वर्षांच्या सवयीबद्दल सांगितले. आजही ती जुनी पानं चाळताना मनाला किती आनंद देतात हे बाईंच्या तोंडून ऐकता ऐकताच भारावून जाऊन मी ही संकल्प सोडला-  नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून अशीच दैनंदिनी लिहिण्याचा. रोज घडलेल्या दिवसांचा इतिवॄत्तांत त्या दिवसाला लिहून ठेवायचा. झालं.... बाबांच्या मागे भुणभुण सुरू झाली, “मला नवी डायरी पाहिजे.बाबांनी डझनभर डायऱ्या माझ्या पुढ्यात टाकल्या, “घे यातली तुला जी आवडेल ती.पण बाबांना कोणीतरी दिलेली डायरी मी का गोड मानून घेऊ? शी, अशी नाही मला मस्त डेकोरेटीव्ह डायरी हवीये माझ्या पसंतीची. लेकीची आज्ञा शिरसावंद्य मानून मग मनपसंद डायरी घरात येऊन १ जानेवारीची प्रतिक्षा करू लागली.
रोज त्या डायरीच्या रंगीत गुळगुळीत पानांवरून हात फिरवताना मला मीच दिसत असे डायरी लिहीणारी... आत्ताची मी, काही वर्षांनी मोठी झालेली मी आणि अगदी म्हातारपणी, जुनी पानं जी मी  आत्ताच्या वयात लिहीली होती ती वाचत स्वतःशीच खुदकन हसणारी मीवा! त्या वाट पहाण्यात किती आतुरता, अधीरता होती म्हणून सांगू! दरम्यानच्या काळात मित्र-मैत्रिणींना, भावंडांना या माझ्या संकल्पाबद्दल माहिती देऊन झाले होते. त्यात काय नि कसे लिहायचे याचा आराखडा मनात तयार होत होता. असे करता करता शेवटी १ जानेवारी उजाडला. पण सकाळी सकाळी डायरीत काय लिहीणार? दिवसभरातील घडामोडी नोंदवण्यासाठी तो दिवस पार तर पडला पाहिजे ना? मग परत दिवस सरायची प्रतिक्षा. त्या दिवशी प्रत्येक व्यक्तीबरोबर झालेल्या संवादावर माझे बारीक लक्ष होते. कोण आलं? कोण गेलं? त्या दिवशी मी काय काय केलं? यांपैकी काय कायहायलाईटट्सम्हणून निवडून डायरीत लिहायचं अशा सार्या बाबींचा धांडोळा घेतला जात होता. रात्रीची जेवणं झाल्यावर मी माझं मोस्ट अवेटेडकाम करायला बसले. आवडत्या पेननेआवडत्या ठिकाणी बसत, देवाला नमस्कार करून डायरी लेखनास सुरुवात केली. मनात सारं योजलेलं होतच त्यामुळे झरझर लिहून पुरंही झालं. मग घरातल्या प्रत्येक सदस्याला ते दाखवण्याची लगबग. कुणीसं सांगितलं, "अगं दाखवायची नसते कुणाला आपली डायरी, आपली आपल्यापाशीच ठेवायची, आपणच वाचायची अधे-मधे," ही नवी माहिती मिळाली होती डायरीबद्दलत्यानुसार मी स्वतःच त्या पहिल्या पानाची पारायणं केली.
मग उजाडला दुसरा दिवस. नाताळच्या सुट्टीनंतर शाळा उघडणार होती. आठ-दहा दिवसांनी मित्र-मैत्रिणी भेटल्या. मस्त मजेत गेला तो दिवस आणि डायरीत लिहायला भरपूर मसालाही मिळालाच. त्यानंतरच्या दिवशी परीक्षेची तारीख कळली आणि अभ्यासक्रम पुरा करण्यापायी जो तो शिक्षक भरभरून लिहून देऊ लागला. किती ते हात दुखून आले  होते त्या दिवशी... आई गं... अजून आठवतंय मला. जाऊ दे, आज नकोच लिहूयात डायरी, नाहीतरी आज काही उल्लेखनीय असं घडलंही नाहीये संपूर्ण दिवसात. अशा प्रकारे त्या दिवशीचं पान कोरं राहिलंदुसर्या दिवसापासून परीक्षेची तयारी, गॄहपाठ करायलाच वेळ पुरत नव्हता तर डायरीकडे कसलं लक्ष जातय? एकदा अशीच परीक्षा होऊन गेलेल्या विषयांची पुस्तकं आत खणात ढकलतांना ती डायरीही आत गेली, ती बाहेर निघाली वार्षिक परीक्षेच्या निकालानंतर जुनी पुस्तकं निकालात काढण्यासाठी खण साफ केला तेव्हाच. तब्बल चार महिन्यांच्या गॅपनंतर. काय करावं? एकदा आधी लिहिलेली पानं वाचली. शी, काय लिहिलंय आपण लिहायचं म्हणून. आपण तर सध्या शाळेत आहोत. त्यामुळे काहीहॅपनिंगअसं घडतच नाहीये आपल्या आयुष्यात... जेव्हा कधी असंसनसनाटीघडू लागेल तेव्हाच डायरीलेखन  सुरू करावं...  झालं. मनाने चंग बांधला आणि त्या दिवसापासून आजतागायत मी माझ्या जीवनात काहीतरी हॅपनिंगसनसनाटी घडायची वाट बघतेच आहे... ते घडू तर दे, मग घेतलीच नवी डायरी आणि बसलेच लिहायला.
तर अशी ही कहाणी माझ्या पहिल्यावहिल्या संकल्पाची, जी कधी सुफळ संपूर्ण होणार हे एक तो सर्वांच्या आयुष्याच्या डायर्या लिहिणारा विधाताच जाणे.
यानंतर मध्येच कधीतरी मराठी भावगीतं डायरीत उतरवून घ्यायचा संकल्प सोडला. सकाळी अकरा वाजता विविध भारतीवर हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम लागत असे. त्या सुमारास रेडिओजवळ बसून आवडलेलं भावगीत लागलं की ते आधी ऐकता ऐकता पटापट रफ वहीत लिहून घ्यायचं आणि मग सुवाच्य अक्षरात डायरीत उतरवायचं. हे मात्र बरेच दिवस सुरू होतंत्या डायरीचं आणि म्हणून माझ्या संकल्पाचं पुढे काय झालं ते नीटसं आठवत नाही, पण आता कधीही ती भावगीतं कानांवर पडली की लहानपणीची रेडिओला कान लावून शब्द न शब्द कॉपी करणारी मी आवर्जून डोळ्यांसमोर येते मात्र.

त्यानंतरही असेच काहीबाही संकल्प मी सोडतच राहिले आणि माझ्या शिरस्त्याप्रमाणे ते तसेच मध्येच सोडूनही दिले. कॉलेजात असताना एकदा ग्रुपमध्ये गप्पा मारत असताना या संकल्पांचा विषय निघाला आणि मी माझ्या मित्रमैत्रिणींना माझे वर लिहिलेलेसंकल्पाख्यानऐकवले. माझ्या आळशीपणाची पुरती खिल्ली उडवली त्या दिवशी सर्वांनी. तेव्हाच आमचा एक वर्गमित्र मात्र त्याच्या संकल्पांबद्दल भरभरुन बोलला. त्याला लहानपणापासून ट्रेकिंगची विलक्षण आवड. त्याच्या बाबांच्या बरोबरीने आणि मोठा झाल्यावर ट्रेकर्स ग्रुप जॉइन करून त्याने बरेच ट्रेक्स पूर्ण केले. दर वर्षाच्या सुरुवातीला तो या वर्षात किती आणि कोणते ट्रेक्स पूर्ण करायचे याची आखणी करत असे आणि वर्षभरात त्याची अंमलबजावणी. त्याचं असं ध्येय समोर ठेवून त्याचा पाठपुरावा करत असलेलं आयुष्य पाहून स्वतःचीच लाज वाटली होती तेव्हा की आपण साधे सुधे छंद म्हणून सोडलेले संकल्पही नाही पुरे करू शकलो. आपला हा मित्र तर एकाच संकल्पाचा ध्यास घेऊन त्याच्या पूर्तेतेसाठी किती झटतोय. खरंच हॅट्स ऑफ टू हिम! त्या दिवशी मनाने खट्टू झाले होते खरी.
कैक वर्षे सरली या घटनेला. स्मार्ट फोन्स जन्मले आणि व्हॉट्स अप, फेसबुकने परत एकदा सारे विखुरलेले मित्रमैत्रिणी पाच इंचाच्या मोबाईलमध्ये सामावून घेतले. रि-युनियन्स ठरल्या आणि त्या ट्रेकर मित्राची आठवण झाली. कुणीसं म्हणालं की दोन वर्षांपूर्वी हिमालयात ट्रेकसाठी गेला असताना अपघात होऊन तो गेला... मोबाईलवरची अक्षरे धूसर झाली तेव्हाएका क्षणात त्या दिवशीचं माझंसंकल्पाख्यानआठवलं. माझी मस्करी आणि त्याचा संकल्प तडीस नेण्याचा ध्यास...
दरवर्षी नियोजनपूर्वक संकल्प करून ते प्रयत्नपूर्वक तडीस नेणारा आमचा मित्र, जोडीदाराला आयुष्यभराची साथ देण्याचा केलेला संकल्प मात्र नाही पुरा करू शकला.
त्या दिवशी एक संकल्प सोडला मात्र - नवं वर्ष सुरू होण्याची वाटही न पाहता... आत्त्ता या क्षणापासून आयुष्य  स्वच्छंदीपणे  उपभोगायचं. जे करावं वाटेल, शिकावं वाटेल ते कुणाची, कसलीही लाज, तमा न बाळगता भरभरून करायचं, शिकायचं आणि हो, हा संकल्प सोडताच मात्र गेली कित्येक वर्षं  ज्या 'हॅपनिंग' आयुष्याची मी वाट बघत होते, ते मिळालं मला- प्रत्येक दिवशी, दिवसातल्या प्रत्येक क्षणी  अगदी पावलोपावली. त्यांची क्षणचित्रं लिहायलाही सुरुवात केलीच मनाच्या डायरीत, दिवस सरण्याची वाट न पाहता, प्रत्येक क्षणी आणि  माझी डायरी बहरू लागलीये एकदमसनसनाटी हॅपनिंगक्षणांच्या आठवणींनी.
 -कांचन देशमुख



2 comments: