समाज हित जपणारी उद्योजिका - अपर्णा गोंधळेकर

गेली पंधरा वर्षे मी रिन्युएबल एनर्जी क्षेत्रामधे काम करते आहे. चंद्रपूरहून पुण्यात आल्यावर मी ‘गंगोत्री’मध्ये काम करायला सुरुवात केली. गंगोत्रीमध्ये मुख्यत: जैवइंधनावर (बायोमास) आधारित काम केले जाते. ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असली तरी मुख्यत: समाजहिताला प्राधान्य देणारी; विविध प्रकारचे संशोधन करणारी, छोटी, पण हुशार लोकांची कंपनी. खरे तर मी सुरुवात केली ऑफिस अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून. कुठल्याही कामाला नाही म्हणायचे नाही आणि मिळणाऱ्या संधीचा उपयोग करून नवीन गोष्टी शिकायला प्राधान्य द्यायचे, हेच लक्षात ठेवून काम करत गेले.

ऑफिस अॅडमिनिस्ट्रेटर ते अकाउंटंट, को-ऑर्डीनेटर, प्रॉडक्शन मॅनेजर, सीईओ- सेल्स & मार्केटींग अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत गेले. बरेचदा इतर ठिकाणी काम करायची संधी मिळत होती, पण समाजाला उपयुक्त होईल अशा विषयात काम करायचे असल्याने दुसरीकडे जायचे नाही असे ठरवले.

आपल्या देशामध्ये भरपूर प्रमाणात जैवविविधता आहे. नैसर्गिक साधनेसुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. पण त्यांचा वापर न करता, मोठ्या प्रमाणावर परकीय चलन वापरून परदेशातून इंधन आणले जाते. उपलब्ध साधनसंपत्तीचे योग्य प्रकारे नियोजन केले गेले तर दुसऱ्या देशांवरचे अवलंबित्व कमी होईल. आपल्या देशातला पैसा आपल्या देशातच राहील. तसेच फॉसिल फ्युएलवरचा ताणही कमी होईल. शेतीजन्य कचऱ्यापासून उत्पन्न मिळायला लागले तर आपला शेतकरीही साधन होईल. त्याचेही अनेक दूरगामी परिणाम आणि फायदे, एक समाज म्हणून आपल्यालाही मिळतील. गंगोत्रीमध्ये मुख्यत: जैवइंधनावर (बायोमास) आधारित काम केले जाते. फॉसिल फ्युएलचे जगभरातले साठे मर्यादितच आहेत. त्यामुळे त्याना पर्याय शोधणे ही काळाची गरज आहे.

वर्षभरापूर्वी मी स्वत:ची ‘अविरत बायोफ्युएल्स’ नावाची कंपनी सुरू केली. आम्ही पेलेट्स बनवतो. पेलेट्स म्हणजे कोणत्याही झाडाच्या/वनस्पतीच्या कोणत्याही भागापासून बनवलेल्या खडूच्या आकाराच्या कांड्या. याला ‘ग्रीन फ़्युएल’ही म्हणतात.  यात मुख्यत्त्वे लाकडाचा भुसा वापरला जातो. भुशाचे कण ८ मि.मि. मापाचे असतात. सोयाबीनची टरफलं, तांदूळ, ज्वारी, बाजरी अशा तृणधान्याचे दाणे काढून राहिलेले भाग, लॉन कटिंग करून झाल्यावर निघालेले गवत, पालापाचोळा; थोडक्यात म्हणजे झाडाचा मुख्य वापर करून इतर कुठे उपयोग होणार नाही असा उरलेला कोणताही भाग- अशा सगळ्याचा वापर कच्चा माल म्हणून होतो. तर हा मोठ्या आकाराचा माल यंत्रांच्या साहाय्याने बारीक केला जातो. त्यात प्लॅस्टीक, धातू, माती, खडे असे काहीही मिसळलेले चालत नाही. बारीक केल्यानंतर हा भुगा आवश्यक तितका वाळवला जातो. हा भुगा मग ८ मि.मि.पेक्षा छोटे कण होतील इतका बारीक केला जातो. मग त्यात तेलकट द्रव्य असणाऱ्या झाडाचा भुगा विशिष्ट प्रमाणात टाकला जातो. हा तेलाचा अंश या सगळ्या भुग्यासाठी बंधक म्हणून काम करतो. आता हा सगळा माल पेलेट्स मशीनमध्ये घालून हव्या त्या आकाराचे आणि मापाचे पेलेट्स तयार केले जातात.  
हे पेलेट्स इंडस्ट्रीयल बॉयलर्स आणि भट्ट्या यांमध्ये, कोळसा आणि तेल यांच्या ऐवजी वापरले जातात.

या प्रकारच्या इंधनाचे काही फायदे पुढीलप्रमाणे – 
१.     पर्यावरणपूरक इंधन
२.     प्रदूषणमुक्त इंधन
३.     टाकाऊ मालाचे इंधनात रूपांतर
४.     फॉसिल फ्युएलला पर्याय
५.     धूरमुक्त इंधन असल्याने स्वयंपाकासाठी उपयुक्त. घर प्रदूषणमुक्त राहू शकते
६.     इंधनावरील खर्चात बचत.

हे काम करताना येणाऱ्या अडचणीही या कामासारख्याच वेगळ्या आहेत. पेलेट्सच्या कच्च्या मालात, म्हणजे या भुग्यात आर्द्रता विशिष्ट प्रमाणातच असावी लागते. त्या त्या ऋतूप्रमाणे तो भुगा वाळण्यासाठी लागणारा वेळ बदलतो. पावसाळ्यात अडचण होते. वजनाला हलके असल्याने हा सगळा कच्चा माल खूप जागा व्यापतो. त्यामुळे एका वेळी जास्त साठा करून ठेवता येत नाही. कच्चा माल मागवणे, प्रोसेस करून तयार उत्पादन साठवणे वगैरेमध्ये काळ-काम-वेगाचे गणित सांभाळावे लागते. बाकी यंत्रे बंद पडणे, शिकवून तयार केलेले कामगार न टिकणे ही गोष्ट तर सगळ्याच उद्योगधंद्यामध्ये असतेच.

खरे तर ही फक्त सुरुवात आहे. या क्षेत्रामधे करण्यासारखे खूप काही आहे. पुढचा टप्पा म्हणजे हे तयार इंधन जाळण्यासाठी विविध प्रकारची उपयुक्त यंत्रसामाग्री तयार करण्याचा विचार आहे. प्राथमिक काम सुरूही झाले आहे.

याशिवाय महापालिकेच्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट साठीचे रोल मॉडेल तयार करायचे आहे, ज्यात कचरा गोळा करणे, त्याचे वर्गीकरण, व एका दिवसात त्याचा विनियोग अथवा विल्हेवाट करणे साध्य करायचे आहे.

हा विषय, हे क्षेत्र माझ्या खूप जिव्हाळ्याचे आहे. त्यामुळे हे करताना कितीही अडचणी आल्या तरी त्यांचा सामना करून ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोचायचेच आहे.

        

2 comments:

  1. Hi Aparnaji just gone through your article. I am very much impressed with your views. I wish you best luck in your future journey pl keep it up. Also best wishes on the eve of Jagtik Mahila din i.e. celebrated on 8th March every year. : Vishwas Patwardhan, (retired) Officer SBI, Aurangabad

    ReplyDelete
  2. I would like to pick this blogand Women's Day as an opportunity to appreciate Aparna's Work and consistent approach to make it happen. I wish her good Luck and success always. Keep it Aparna.@Priti Gondhalekar

    ReplyDelete