सदर: निसर्गाच्या सहवासात



माणसाचा निसर्गाशी नेहेमीच संबंध येत असतो. चौसष्ठ कलांमधल्या बऱ्याचशा कलादेखील या निसर्गाशी संबंधित असतात. माणूस आणि निसर्ग याचे नाते पुराणकाळापासून चालत आले आहे. जोडून सुट्टी मिळाली की आपण निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी वेळ व पैसा दोन्ही खर्च करायला तयार होतो. यात खचितच गैर काही नाही. पण आपण माणसांनीच झाडे तोडून निसर्गाला दूर लोटले आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. निसर्गामध्ये झाडे (म्हणजेच वनस्पती), एक अविभाज्य घटक आहे. याविषयीची जागरूकता सध्या वाढत आहे. वृक्षारोपणाचे कार्यक्रम होत आहेत, शहरी शेतीची संकल्पना मूळ धरू लागली आहे.

आपणच निसर्गाला आपल्या जवळ आणायचा प्रयत्न करायचा. शहरात जागा मिळणे कठीण, पण जिथे जागा मिळेल तिथे झाडे-झुडुपे लावायची, वाढवायची. आपल्या बाल्कनीत, गच्चीत, सोसायटीत आपण कुठेही वनस्पती लावू शकतो. त्यासाठी फारसा वेळ व पैसादेखील खर्च होत नाही. फक्त सवयीचा भाग असतो आणि या सवयीचे फायदेदेखील बरेच आहेत. शुद्ध हवा ही सर्वात मोठी जमेची बाजू. अन्नधान्य उत्पन्नामध्ये स्वयंपूर्णता ही आजच्या काळाची गरज आहे.

एका पहाणीनुसार सध्या जगातले फ़क्त १५% अन्न हे शहरामध्ये उत्पन्न केले जाते.  १९८९ नंतर राजकीय परिस्थितीमुळे अन्नधान्य तुटवडा व शेती करायला लागणाऱ्या सुविधांचा अभाव, परिणामी उपासमार, अशा दुष्टचक्रात ‘क्युबा’ हा देश सापडला. पण “urban organic farming” द्वारे हरितक्रांती करून क्युबा या लहानशा देशाने जगासमोर एक आदर्श उदाहरण घालून दिले. ‘व्हेनेझुएला’ हा देशही यात खूपच प्रगती करत आहे. जगात बऱ्याच ठिकाणी थोड्या थोड्या प्रमाणात ही चळवळ मूळ धरू लागली आहे. बंगलोर, मुंबई इथेसुद्धा प्रयत्न चालू आहेत.

एकदा का वनस्पतीचे विज्ञान आणि गणित आपण समजावून घेतले की त्यांची जोपासना करणे आपल्यालाही सहज शक्य होईल. सूर्यप्रकाश आणि हवेतल्या आपल्याला नको असणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईडच्या साहाय्याने वनस्पती आपले स्वतःचे अन्न तयार करते, हे विज्ञान सर्वांनाच माहितीचे आहे. आता वनस्पतीच्या वाढीला लागणाऱ्या पोषक गोष्टी, वातावरण निर्मिती, घटकमूल्ये यांचे प्रमाण किती असावे हे झाले गणित. एकदा का हा प्रयोग जमला ना, की आपल्याला छंदच लागतो त्याचा.


आपल्याकडची उपलब्ध जागा बघून त्याप्रमाणे आपण ठरवू शकतो की आपल्याला काय काय लावायचे आहे. घरच्या घरी आपण शेतीदेखील करू शकतो. ‘डॉ.जगदीशचंद्र बोस’ यांनी सिद्ध केले आहे की वनस्पतींचे मन माणसांसारखे असते. वनस्पतींची शारिरीक वाढ (असे म्हटले तर वावगे ठरू नये) ही माणसांसारखीच होते. बाल्यावस्था, तारुण्य, प्रौढत्वाच्या दोन अवस्था आणि म्हातारपण. झाडांचे आयुष्य या पाच टप्प्यांच्या कालावधीत विभागले जाते. प्रत्येकाचे आयुष्यमान वेगवेगळे. त्या प्रमाणे प्रत्येक झाडाचे फुले आणि फळे यायचे एक ठरावीक गणित बनून जाते. उदाहरणार्थ, भाजी ही कोवळी असताना काढली जाते, तर फळ तयार झाल्यावरच. म्हणजे भेंडी साधारणत: सव्वा महिन्यानी काढू शकतो, तर कलिंगड सव्वातीन महिन्यांनी. वर उल्लेखिलेल्या पाचही अवस्थांमध्ये वनस्पती वाढीला काय लागते, तर चांगली माती, पाणी आणि सूर्यप्रकाश. या तीनही गोष्टींचे गणित कसे बसवायचे, एकदा रोप वाढले की त्याची जोपासना कशी करायची, त्याला वाईट गोष्टींपासून कसे जपायचे हे आपण पुढील भागांमध्ये सविस्तर पाहू या. या सदरातून निसर्गाशी जवळीक साधण्याचा आपण सर्व जण आपल्यापरीने प्रयत्न करू या.


                    -- सौ. रुपाली गोखले

1 comment:

  1. खूप छान लिहिलं आहे....माहितीपूर्ण !

    ReplyDelete