स्वतंत्र भारताची क्रीडा जगतामधील वाटचाल-१

भारतात स्पोर्ट्सविषयी बोलायचे म्हटले की क्रिकेटबद्दलच जास्त बोलले जाते. १९९०-२००५ च्या काळात टेनिस आणि सध्या बॅडमिंटन पण लोकप्रिय झाले आहेत. पण क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन हे खेळ पूर्वीसुद्धा इतके लोकप्रिय होते का?

जर आपण भारतीय क्रीडाजगतातील स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर लगेचची काही वर्षे बघितली तर आपल्याला वेगळेच चित्र दिसेल.

भारताने १९५० आणि १९६० च्या दशकात बऱ्याच खेळांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, पण त्यात क्रिकेट नव्हते हे विशेष सांगावेसे वाटते.



आपण हॉकीमध्ये १९२८ सालापासून ते १९८० पर्यंत जागतिक वर्चस्व गाजवले होते. त्या दरम्यान झालेल्या १२ ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ८ सुवर्ण, १ रजत आणि २ कांस्य अशी पदके जिंकून हॉकी जगतात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

Indian Hockey Team for 1948 Olympics
पण त्याच वेळेस भारताचा फुटबॉल संघ जगात टाॅप 20 संघात गणला जायचा हे फारसे कुणाला माहिती नाही. आपल्या फुटबॉल संघाने १९५१ व १९६२ ची आशियाई स्पर्धा जिंकली आणि १९५६ च्या मेलबर्न ऑलिंपिकमध्ये ४ था क्रमांक पटकावण्याचा पराक्रम केला. आपला संघ इतका चांगला होता की त्यांना १९५० च्या FIFA विश्वचषक स्पर्धेमध्ये थेट एन्ट्री मिळाली होती. पण दुर्दैव असं की सुविधांची कमतरता आणि आर्थिक परिस्थितीमुळे भारतीय फुटबॉल संघ ह्या विश्वचषक स्पर्धेत भाग घेऊ शकला नाही.


हॉकी आणि फुटबॉलसारख्या सांघिक खेळाबरोबर भारत वैयक्तिक खेळांमध्ये सुद्धा चमकत होता. १९५२ साली हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये श्री. खाशाबा जाधव यांनी कुस्तीच्या स्पर्धेत स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक पदक मिळवले. कांस्य पदक जिंकून जेव्हा ते मुंबई विमानतळावर परतले तेव्हा त्यांच्या स्वागतास फक्त त्यांच्या गावाकडील काही मोजकीच मंडळी उपस्थीत होती.


१९५८ मध्ये साधारण २५ मैलांची इंग्लिश खाडी पोहोणारे पहिले भारतीय म्हणून ओळखले जाणारे मिहीर सेन यांनी १९६६ साली एका कॅलेंडर वर्षात पाच महासागरांत जलतरण करणारा जगातील एकमेव मनुष्य होऊन इतिहास रचला होता. यासाठी त्यांचे गिनीज बुकमध्ये नाव नोंदवले गेले आहे, ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.

मिहीर सेन यांच्या पाठोपाठ १९५९ साली आरती साहा ह्या महिलेने इंग्लिश खाडी पोहून पार केली आणि असा विक्रम करणारी पहिली भारतीय महिला ठरली, ही गोष्ट कुणाला फारशी माहिती नाही.



ह्या काखंडातला अजून एक खेळाडू म्हणजे  ‘द फ्लाईंग सिख’ अर्थात मिलखा सिंग! त्याने १९५८ व १९६२ च्या आशियाई खेळांमधले ४ सुवर्ण आणि १९५८ सालच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये १ सुवर्ण, अशी एकूण ५ पदके जिंकली. १९६० साली ४०० मी. शर्यतीचा ऑलिम्पिक विक्रम मोडूनदेखील त्याला ४थ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. 






Ramnathan Krishnan
भारतामध्ये टेनिसला लोकप्रिय करण्यात लिएंडर पेसमहेश भूपती व सानिया मिर्झाचे योगदान आपणा सर्वांना ठाऊक आहे. पण१९५० आणि १९६० च्या दशकात रामनाथन कृष्णन हे जगातील आघाडीच्या टेनिसपटूंपैकी एक होतेहे तुम्हाला माहिती आहे का? १९६० व ६१ मध्ये विंबल्डनमध्ये उपांत्य फेरीत पोहोचलेले आणि जागतिक क्रमवारीतही सहाव्या क्रमांकावर पोहोचलेले रामनाथन कृष्णन हे एकमेव भारतीय टेनिसपटू आहेत.

Ramesh Krishnan
Amritraj Brothers
काही वर्षांनंतर रामनाथन यांचा पुत्र रमेश कृष्णन आणि अमृतराज बंधू यांनी भारतीय टेनिसचा वारसा पुढे चालवला. 




१९९० नंतर महेश भूपतीलिएंडर पेस आणि सानिया मिर्झा यांनी ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळवून टेनिस जगतात यशाचे शिखर गाठले. १९९९ सालच्या सर्व ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारे पेस व भूपती त्या वर्षी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी होते.





१९८० चे दशक तर अविस्मरणीय होते. प्रकाश पदुकोण यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकून १९८० च्या दशकाची दमदार सुरुवात केली.









भारतीय क्रिकेट टीमने १९८३ चा विश्वचषक आणि १९८५ ची वर्ल्ड चॅम्पिअनशिप जिंकून जागतिक क्रिकेटमध्ये आपले आगमन घोषित केले. 
1985 B&H Champions
1983 World Cup Victory 
भारताने १९८७ सालच्या क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन केले आणि जागतिक क्रिकेट मध्ये भारताचा प्रभाव वाढत असल्याची चिन्हे दिसू लागली.

त्यासुमारास घराघरात टी.व्ही. पोहोचले होते. त्यामुळे लोकांना जगभरात घडणाऱ्या मोठ्या स्पर्धांचे थेट प्रक्षेपण पाहायला मिळत होते. बऱ्याच जणांना ऑलिंपिक स्पर्धा बघण्याचा अनुभव १९८४ साली घेता आला. त्यात पी. टी. उषाची अफलातून कामगिरी आणि एक शतांश सेकंदाने हुकलेले तिचे पदक ही ठळक वैशिष्ट्ये होती. 



१९८२ च्या आशियाई स्पर्धेचे यजमानपद भारताकडे होते. त्या निमित्ताने दिल्ली शहरामध्ये खूप बदल झाले. रस्ते सुधारणा आणि आधुनिक सुविधा असलेली नवीन क्रीडांगणे तयार करण्यात आली. एशियाडच्या निमित्ताने बऱ्याच राज्यांत नवीन आराम बस सेवा सुरू झाल्या, ज्या आजतागायत कार्यरत आहेत.

एकंदरीत स्पर्धेचे आयोजन आणि टी.व्ही. च्या थेट प्रक्षेपणामुळे अंतरराष्ट्रीय क्रीडाजगताबद्दल मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली. कदाचित त्यामुळेच पालक आणि शाळकरी मुले अभ्यासाबरोबर खेळाकडे लक्ष देऊ लागले. या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पुढच्या पिढीवर कसा झाला हे आपण या लेखाच्या पुढच्या भागात बघू या. 

टीप : १९४७ ते १९९९ पर्यंतच्या काळातील सर्व खेळांतील लक्षवेधी कामगिऱ्यांचा  उल्लेख करण्याचा प्रयत्न केला आहे. काही खेळाडू किंवा काही घटना वगळल्या गेल्या असतील तर आम्हाला जरूर कळवा.

सारंग गाडगीळ


7 comments:

  1. सारंग, एकदम छान लेख. ह्यामधल्या काही घटना तर माहितीच नव्हत्या. पुढच्या भागाची वाट पाहात आहे :-)

    ReplyDelete
  2. एकदम छान आणि well researched लिहिलंस

    असाच चालू ठेव
    अन एका पुस्तकात रूपांतर होऊ दे

    ReplyDelete
  3. सारंग, एकदम छान लेख लिहिला आहेस, पुढच्या लेखची आतुरतेने वाट बघतोय
    चांगला अभ्यास केला आहेस.
    या पुढचा इतिहास सगळ्याना माहीत असल्यामुळे अलीकडच्या खेळाचा सारांश लिहिने कठीण आहे पण तू तो उत्कृष्ट लिहीशील

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. पुढचा भाग interesting करण्याचा प्रयत्न करीन.

      Delete
  4. Well done Sarang..keep writing "

    Deepali Gotadke

    ReplyDelete