पसारा


मी कामानिमित्त बाहेर गेले होते. बाहेरून आले. घरात पाऊल टाकले, पहावे तर घर म्हणजे इतस्ततः पसरलेले. ज्याला जी गोष्ट वाटली ती घेऊन पुन्हा जागी  ठेवता तिथेच टाकलेली. पहावे तिथे पसरलेला पसारा. एक मिनिट वाटले की, पुन्हा घराबाहेरच जावे. घरात जाऊच नये, म्हणजे दृष्टी आड सृष्टी. तो पसरलेला पसारा पहाणे नको  पसारा आवरणे नको.

पण छे! बाहेर तरी किती वेळ रहाणार? एक तास, दोन तास. मग घरी येऊन तरी पसारा पहाणे व आवरणे आलेच नाआणि आपल्या शिवाय कोण आवरणार
म्हणतात ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तेव्हा मरण हे आलेच, म्हणजे ओघाने आवरणे पण आलेच. तेव्हा मी मुलांना हाका मारीत आत आले. अरे मुलांनो, तुम्ही केलेला तुमचा रोजचा पसारा आवरा.

त्या वेळी आजी मात्र हसत हसत गाणे गुणगुणत होती. मला तिच्या गाण्याचा त्रास वाटत होता. त्या पसाऱ्यानी मला त्रास होतो, डोकं फिरतंय, कोठून आवरू वा आवरण्यास सुरुवात करू सुचत नाही आहे आणि ही मात्र मजेत गुणगुणत आहे.

अरे हा खेळ दुनियेचा
पसारा मांडिला सारा
माझी  तोंडाने  बडबड  चालूच होती. कुठल्याही खोलीत जावे, तिकडे पसरलेले. रोजचे  रोज कितीही आवरा तरी तेच, पसरून ठेवलेले. पसारा आवरणे काही संपत नाही. मुलांच्या खोलीत जाउन पहावे तर त्यांनी त्यांच्या खोलीत पुस्तके, कपडे खेळणी जे हवे ते घेऊन, बाकी इकडेतिकडे पसरून ठेवलेले असते . त्यांचा पसारा आवरून हॉलमध्ये यावे, तर सकाळचे पेपर वाचून झाल्यावर वर्तमानपत्राचे प्रत्येकाने  पान न पान वेगळे करून वाचल्याने, तेथे वर्तमान पेपरचा पसारा.
सकाळी चहा नाश्त्याच्या डायनिंग टेबलावर कपबशा, नाश्त्याच्या डिशेस, त्याच बरोबर इतर वस्तूंचा पसारा असतो. तेव्हा थोडक्यात काय, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पसारा करणे व पसारा आवरणे चालूच असते व जीवन जोपर्यंत आहे   तोपर्यंत पसारा आवरणे हे असेच चालणार. एवढेच नव्हे, तर  जन्मापासून मरणापर्यंत पसारा करणे, तो वाढविणेव आवरणे हे पण चालूच रहाणार.
तेव्हा ह्या विचारांनी मला आजी गुणगुणत असलेल्या गाण्याचा खरा अर्थ कळला. ती जे गाणे गुणगुणत होती, ते गाणेच मला सांगू लागले, की खरा पसारा तर ह्या विश्वकर्माने करून ठेवला आहे. एवढ्या मोठ्या या दुनियेची, जगाची निर्मिती केली आहे व त्याच्या पसाऱ्यासमोर आपला पसारा काहीच नाही.
त्याने काय काय पसारा करून ठेवला आहे, याची त्याला पण भ्रांत नसेल. हे जग व जगाचे रहाटगाडगे, रोजचे नियमित दिनचक्र चालविणे, रोजचे नवनवीन सृष्टीत बदल घडविणे, जुन्याचा नाश करणे, काही ठिकाणी झीज करणे तर काही ठिकाणी  वृद्धी करणे हे त्या   विश्वकर्माचे  चालूच असते.
त्याचा  पसारा व त्याच्या पसाऱ्याचा व्याप फार मोठा आहे. मनुष्य जन्माला येतो तेव्हा काही न घेता येतो पण देवाने मानवास मेंदू बहाल केल्याने हळूहळू तो जसा मोठा होतो तसा त्याच्या बुद्धीचा विकास होतो. त्यामुळे सुरवातीस आई, वडील, बहिण, भाऊ या नातेवाइकांच्या  पसाऱ्यात गुरफटतो. पुढे त्याचा कौटुंबिक गोतावळ्याचा पसारा वाढतो. तर पुढे वस्तूंचा, भौतिक गोष्टींचा पसारा तो वाढवित जातो. प्रथम एक घर, एखादी गाडी करता करता जमीन, घरे, गाडया या भौतिक सुखात अडकून सुखसोयींचा पसारा वाढवितो. मग ह्या पसाऱ्यातून बाहेर निघणे, तो पसारा आवरणे दिवसेन्दिवस कठीण जाते. त्याचा हा सर्व  पसारा  वाढतच जातो.

त्या विश्वकर्माच्या पसाऱ्यात पण त्या विश्वकर्माने केवढी जीवसृष्टी तयार करून पसारा मांडला आहे. जल, चर, स्थळ सृष्टीचा समावेश आहे. आणि ही सर्व सृष्टी एकमेकास पूरक आधारित आहेत. त्याने  केलेल्या ह्या पसाऱ्याशिवाय एकमेकांचे जीवन शक्य नाही. या सर्व सृष्टी एकमेकात गुंतलेल्या आहेत. त्याचा हा निसर्गसृष्टीचा पसारा सर्वांना आनंददायी असतो.

पण, आपण मानवाने स्वत: केलेला पसारा आवरणे थोडे फार तरी शक्य आहे . भौतिक सुखाच्या पसाऱ्यातून मन तृप्त करणे, मन भरून घेणे, व त्यातून बाहेर निघणे हे जमते व  जमू शकते. जसं खूप उपभोगल्यावर मन तृप्त होऊ शकते. पण मानवाला त्याने मानसिक पसारा जो मांडला आहे, त्यातून मन काढणे अथवा तो पसारा आवरणे फार कठीण आहे. माझे सखेसोबती, माझा गोतावळा ह्या  सर्व पसाऱ्यातून मन काढणे कठीण आहे. तो पसारा आवरण्यासाठी अध्यात्माचीच जोड लागते, गरज भासते. संतांना, महापुरुषांनाच जमते ते, बाकी सर्वसामान्यांस त्या मानसिक  पसाऱ्याचा मन:स्ताप होतो. 
खरेचपसारा जीवनाचा मुख्य घटक आहे. जर एखाद दिवस घर फारच नीटनेटके आवरले असेल व स्वच्छ घरात आपण एकट्याच असलो तरी घर अंगावर येते ना? कारण घरात माणसे, पसारा, आणि त्या पाठोपाठ घराला येणारा जिवंतपणा तर आपल्याला हवा असतो. ह्या विचाराने मी सर्व घर नीट केले व आजीचे  गाणे मीच गुणगुणू  लागले.


-- वैशाली वर्तक

No comments:

Post a Comment