वळीव - रश्मी पानसे - नाझिरकर

प्रचंड उकाडा.. जीवाची नुसती तगमग होतीये.. हवा अशी नाहीच .. वातावरण एकदम कुंद झालेलं.. गच्च गच्च तर इतकं की कधी एकदा पाऊस कोसळतोय असं झालंय पण पावसाच्या धारांच्या ऐवजी घामाच्याच धारा वाहतायेत.. त्यातून लाईट पण गेलेले त्यामुळे पंख्याशिवाय 'जीव जायसे सत्वर करा' अशी अवस्था.. त्यातल्या त्यात, जीव रमवण्यासाठी रेडिओ लावलेला.. तेवढ्यात बाहेर वातावरणात अचानक काही बदल होऊ लागतात, गडगडाट ऐकू येतो, वारा सुटतो - खरं तर वावटळच, मधेच लखकन वीज चमकून जाते.. रेडिओवर आशाताई मखमली आवाजात गात असतात - "जशी अचानक या धरणीवर, गर्जत यावी वळवाची सर".. आणि नेमका त्याचवेळी बाहेर, धरणीला आणि धरणीपुत्रांना तृप्त करायला, वळीव बरसू लागतो!! आहाहा!! किती सुंदर योग!! 


भर उन्हाळ्यात मधेच पडून जाणारा वळीव खरंच खूपच हवाहवासा असतो.. मुंबईकरांच्या भाग्यात हे सुख नाही. पण उन्हाळी सुट्ट्यांसाठी माहेरी असल्यामुळे मला हे सुख अनुभवता येतं! प्रचंड उष्म्याशी लढत असताना मधेच आलेला हा 'देवदूत' गात्र अन गात्र सुखावून टाकतो आणि पुढे किमान महिनाभर तरी चालणाऱ्या उन्हाळ्याशी दोन हात करायला मनाला एक ताकद देऊन जातो! पावसाळ्यासारखा तो सलग चालू राहात नसला तरी भर उन्हाळ्यात मिळालेली त्याची 'short n sweet' झलक उन्हाळा एंजॉय करायला हातभार लावते..
बरेचदा तर हा वळीव येताना बरोबर गाराही घेऊन येतो.. कधी ताडताड लागणाऱ्या तर कधी सुईसारख्या बोचणाऱ्या या गारा वेचणे ही पण एक पर्वणीच!! आणि अशा वातावरणात ice-cream खायची मजा काही औरच!! 

अर्थात, या वळवाच्या पावसाचा कधी कधी अगदी 'फुसका बार' पण निघतो हां.. म्हणजे, आधी हवा अतिशय गच्च होते, मग वारा पण सुटतो पण नंतर नुसतीच वावटळ उडवून वळीव कुठेतरी गायबच होतो किंवा अगदीच किरकोळ असे चार शिंतोडे पडतात आणि मग उलट जास्तीच उकडायला लागतं.. आणि जरा वारा सुटला की लाईट्स मात्र हमखास जाणार!! मग बसा भट्टीत उकडून घेत.. आणि असल्या अर्धवट सरींनी कसलेसे किडे बिडे येतात ते वेगळंच! पण मग तुमच्या सहनशक्तीची पूर्ण कसोटी पाहिल्यावर मात्र तो तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतोच!! 


आपल्या आयुष्यात पण असे 'वळीव अनुभवण्याचे' कितीतरी क्षण येतात, नाही? कधीतरी मन खूप त्रासून जातं, जीवाची घालमेल होते आणि मग, अचानक, मन सुखावून जाणारी एखादी छोटीशीच घटना घडते जी त्यावेळच्या त्रस्त मनावर फुंकर तर घालतेच शिवाय परत नव्याने आयुष्याला सामोरं जाण्यासाठी मनाला उभारीही देते! असे छोटे छोटे वळीव मिळून आपलं आयुष्य किती सुखाचं बनवतात! अर्थात कधी कधी, काही फुसके बार ही निघतात पण ते ही आपली कसोटी बघून आपल्याला 'टफ' करण्यासाठीच असावेत.. आपण थोड्या सहनशक्तीनिशी त्या कसोटीत पास झालो तर परमेश्वरी कृपेचा वर्षाव झाल्याशिवाय खचितच राहणार नाही! 

---रश्मी पानसे - नाझिरकर


No comments:

Post a Comment