सदर- निसर्गाच्या सहवासात (भाग २)



अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा असतात. त्याप्रमाणे वनस्पती वाढीसाठी माती, पाणी आणि सूर्यप्रकाश या मुलभूत गरजा असतात. या तिन्ही गोष्टींविषयी आपण या भागात माहिती घेऊया.

माती विविध प्रकारची असते. ज्या जमिनीतल्या मातीमध्ये खूप प्रमाणात वाळू/रेती असते, अशा  मातीमध्ये वनस्पती वाढीसाठीची पोषक द्रव्ये, आवश्यक जीवजंतू कमी असतात. अशी माती बोटातून पटकन निसटून जाते. शिवाय पाणी किंवा खत घातले तरी त्यातली पोषक द्रव्ये वाहून जातात, कारण मातीच्या दोन कणांमध्ये मोठी जागा किंवा पोकळी असते. काही जमिनीतली माती ही भरपूर चिकणमाती असलेली असते. अशी माती कोरडी असताना घट्ट आणि ओली  असताना चिकट अशी असते. यामध्ये आवश्यक जीवजंतू कमी असतात आणि मुळांची वाढही होत नाही. काही जमिनी या गाळाच्या/चिखलमातीच्या असतात. अशी माती फेस पावडरसारखी मऊ लागते. मातीतल्या पोकळ्या कमी असतात, त्यामुळे पाणी वा पोषक द्रव्ये सहजासहजी वाहून जात नाहीत. तेव्हा जी माती आपण वापरणार त्यामध्ये लहान-मोठ्या पोकळ्या असतील हे बघायचे. म्हणजेच माती porous पाहिजे, घट्ट असता कामा नये नाहीतर मुळांची वाढ होत नाही. माती बारीक असेल तर चांगली. मोठे मोठे दगड असतील तर काढून टाकावे. लाल माती, काळी माती जी उपलब्ध असेल ती वापरायला हरकत नाही. माती कोरडीही रहाता कामा नये. उपलब्ध मातीचा प्रकार ओळखून त्यामध्ये कुजलेल्या जैविक गोष्टी (कंपोस्ट), रेती, वाळू, शेण, पालापाचोळा, गांडूळ खात इत्यादि गोष्टींची भर घालून आपण आपल्याला हवी तशी, म्हणजे आपल्या झाडांना योग्य प्रकारची आपली माती बनवू शकतो. कुंडीमध्ये वेगवेगळ्या प्रकाराने भरू शकतो. जर जमिनीत झाडे लावायची असतील तर प्रश्नच नाही, स्वयंपाकघरातला कचरा, शेण इ. टाकून आपण जमिनीचा कस वाढवू शकतो. कुंडी कशी निवडायची, कशी भरायची, त्यामध्ये काय काय मिसळायचे आपण नंतरच्या भागात बघूया.

पाण्याची गरज सर्व वनस्पतींना असते पण त्याचे प्रमाण कमी-अधिक असू शकते. झाडांना भरपूर पाणी घालणे किंवा खूप कमी पाणी घालणे या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. झाडांना भरपूर पाणी देणे म्हणजे रोगांना आमंत्रण देण्यासारखे आहे. तर झाडांना कमी पाणी देणे म्हणजे त्यांची ताकद कमी करण्यासारखी आहे. ती कोमेजून जातात. जेव्हा रोप लहान असते तेव्हा अगदी कमी पाणी पुरते. पण जस जसे रोप वाढत जाते तस तसे मुळाच्या वाढीसाठी म्हणजे मुळे खोलवर जावीत यासाठी पाणी थोडे थोडे वाढवावे लागते. डेरेदार वृक्ष उन्हाळ्यातही तग धरून असतात तर काही झाडांची आडवी पसरलेली वरवरची मुळे तग धरू शकत नाहीत. ती झाडे कोमेजून जातात, यावरुन लक्षात येईल. झाडांना पाणी कधी घालायचे हे देखिल ठरवावे लागते. सकाळी पाणी घातले तर उन्हामुळे बाष्पीभवन होवून घातलेल्या पाण्याची नासाडी होते. अगदी नगण्य स्वरुपात पाणी मिळते झाडांना. तेव्हा सूर्यास्त ते सूर्योदय हीच योग्यवेळ आहे झाडांना पाणी घालण्याची. जरी सूर्योदय वेळी पाणी घातले तरी बाष्पीभवनाला सुरुवात होईपर्यंत मातीने बहुतांश पाणी शोषून घेतलेले असेल. 



उन्हाळ्यात मात्र सकाळ-संध्याकाळ दोनदा पाणी घालणे श्रेयस्कर ठरेल. कारण उन्हाळ्यात बाष्पीभवन जास्त होत असते. बरे झाडांना पाणी कसे घालावे? पाईपने कधीही घालू नये. कारण पाईपने force ने पाणी पडते. त्यामुळे माती कुंडीबाहेर पडते, मुळेतरी उघडी पडतात किंवा बियांची पेरणी केली असेल तर त्यातरी उघड्या पडतात. त्यामुळे लहान प्लास्टिकच्या भांड्याने तरी पाणी घालावे किंवा आपल्या पाणी प्यायच्या भांड्याने. झारी वापरली तर उत्तमच. पाणी घालताना बाजूने, कडेने घालावे. जमिनीत रोप असेल तर रोपाच्या खोडाजवळ किंवा कुंडीच्या मधोमध पाणी घालू नये. पाणी आपण बरोबर घालतोय ना हे कळण्यासाठी माती बघायची. जर हाताला चिकटली तर पाणी जास्त झाले आहे आणि हाताला नुसतीच ओलसर जाणवली तर आपण योग्य प्रमाणात पाणी घातले आहे असे समजावे. साधारणतः ढोबळपणे कुंडीच्या आकारमानाच्या पंचवीस टक्के पाणीच झाडाला आवश्यक असते. शिवाय पाणी कुठलेही वापारले तरी चालेल. डाळ-तांदुळ धुतल्यावरचे पाणी, RO चे waste जाणारे पाणी, rain water harvesting केलेले असेल तर ते पाणी, अगदी कुठलेही. पूर्वी गावांमध्ये आंघोळीच्या पाण्याचा पाटच झाडांना वापरायची पद्धत होती. एकदा का अंदाज आला की कालांतराने आपणच वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरुन पाण्याचे प्रमाण, कसे, कधी, कशाने घालायचे हे सगळे आपण आपले ठरवू शकतो.

जागेच्या अडचणीमुळे दिवसभरचा सूर्यप्रकाश मिळणे आजकाल शक्य होत नाही. त्यामुळे जरी चार तास सूर्यप्रकाश मिळाला तरी आपण जास्तीत जास्त उपयोग करून घेऊ शकतो. त्याप्रमाणे जागेची निवड करावी. काही वनस्पतींची सूर्यप्रकाशाची गरज जास्त असते तर काहींची कमी. आपल्याकडे सूर्यप्रकाशाची उपलब्धता किती आहे त्याप्रमाणे आपण ठरवू शकतो की कुठल्या वनस्पतींची निवड करायची. उदा. कमी वेळ सूर्यप्रकाश मिळणाऱ्या जागेत कोरफड, पातीचा कांदा लावू शकतो. किंबहुधा घरात देखिल काही झाडे लावू शकतो. उदा. स्नेक प्लान्ट, palm च्या व्हरायटीज. काही झाडांना आठवड्यातून एक दिवस तर काहींना दिवसातून एक तास सूर्यप्रकाश पुरेसा असतो. जर भाजी लावली असेल तर, कमी तासांच्या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला १ किलो ऐवजी अर्धा किलोच भाजी मिळेल. परंतु भाजीचा दर्जा खालावणार नक्कीचं नाही.



काही प्रकारच्या orchids ना शेडमधेच ठेवायचे असते मातीशिवाय (कोळश्याचा बेड), आठवड्यातून एकदाच पाणी घालायचे असते (पण micronutrients विरघळविलेले पाणी). अगदी कमी कष्टात सुंदर फुले फुलतात. अशाप्रकारे निसर्ग माणसाच्या जवळ यायला ऊत्सुक असतो फक्त आपल्याला पाऊल पुढे टाकायची गरज असते. वनस्पतीच्या मुलभूत गरजा आता आपल्याला कळल्या. पुढच्या भागात कुंडी कशी तयार करायची, जमिनीत कसे रोप लावायचे याविषयी सविस्तर बघूया. 

-    सौ. रूपाली गोखले 


4 comments:

  1. Very nice written & informative article

    ReplyDelete
  2. Very nice written & informative article

    ReplyDelete
  3. अतिशय उपयुक्त माहिती आहे - बाग छान फुलेल

    ReplyDelete
  4. आवर्जून कळविल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete